सत्य, अहिंसा व मानवतेचे पुरस्कर्ते
आत्मोध्दार, समाजोद्धार आणि राष्ट्रोद्धारातून विश्वकल्याणाची ओढ हा मानवी बुद्धीचा परिपाक असतो. त्यासाठी अनौपचारिक शिक्षणासह संस्कारक्षम पिढी घडवणे महत्त्वाचे असते. ग्रंथ हे मानवाच्या सर्वांगीण विकासात महान कार्य करतात. ‘चरित्रग्रंंथ’ दिशादर्शक असून नव्या पिढीला मार्ग दाखवतात. थोर महात्म्यांची चरित्रे, जीवनकार्य, सतत विश्वकल्याणासाठी झटणे यातून त्यांच्या आठवणींचा आदर्श निर्माण होत असतो. राष्ट्राला नवसंजीवनी देणार्या या चरित्रलेखांतून एक आदर्श वस्तुपाठ निर्माण होतो. राष्ट्रपिता म. गांधी, महर्षि कर्मवीर भाऊराव पाटील, स्वा. वि.दा. सावरकर, जगन्नाथ शंकर शेट, डॉ. विश्वश्वरैय्या, पंतप्रधान इंदिरा गांधी, जॉर्ज फर्नांडीस, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, कॉ. लेनिन, वृक्षमाता थिमक्का या सारख्या लोकोत्तर व्यक्तीमत्त्वांना या चरित्र लेखातून शांताराम बडगुजर यांनी प्रस्तुत केले आहे.