लोक-स्तंभ
सुमारे दीड दशकापूर्वींचे लेखन असलेला डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा एक स्तंभ दै. लोकमतमधून चालवला गेला होता. त्यातील हे स्तंभलेखन, ‘लोक-स्तंभ’ शीर्षकाने आज ग्रंथरूपात वाचकांपुढे येत आहे. केवळ दीडच दशकापूर्वीचे वेगळे विषय कोणते आणि काय व कसे होते व लोकप्रिय आणि प्रचंड खपाच्या वृत्तपत्रातूनही वाचकांची अभिरुची हे विषय ग्रहण करणारी कशी शिल्लक होती, ते दर्शविणारे हे लेखन आहे. ती जोपासलेले हे लेखन, विषय व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वास्तवही काय होते व झपाट्याने बदलत आज त्याचे नेमके स्वरूप काय आहे याचे तौलनिक आकलन, हे लेखन वाचताना वाचकाला करून घेता येणार आहे. स्तंभ लेखनाच्या मर्यादित शब्दसंख्येच्या घाटातही वैचारिक, महत्त्वाच्या बाबींचे आकलन घडवणारे हे लेखन तेव्हाही विरळाच होते. विविध विषयांवरील हे लेखन वाचणे, तपासणे व त्या विषयांचे व्यापक जनहितानुवर्ती अनेक आयाम उलगडून घेत ते समजून घेणे हे कधी नव्हे तेवढे आज गरजेचे झाले आहे.